Tuesday 29 January 2013

आंध्र प्रदेशातील अबलेला भेटणार कुटुंबीय

आंध्र प्रदेशातील अबलेला भेटणार कुटुंबीय: - चिखलीतील सुनीता व प्रकाश जाधव यांच्या प्रयत्नांना यश

अंकुश शेळके । दि. २७ (चिखली)

कौटुंबिक कलहातून मनावर परिणाम झाल्याने मुलासह नवर्‍याने घराबाहेर काढलेल्या आंध्र प्रदेशातून भटकत हैदराबादमार्गे पुण्यात आलेल्या व चिखलीतील सुनीता व प्रकाश जाधव या दांपत्याने सात महिन्यांपासून आधार दिलेल्या दुर्दैवी महिलेला आता लवकरच तिचा भाऊ भेटणार आहे.

आंध्र प्रदेशातील यावल्ला तालुक्यातील तांदूर गावात राहणार्‍या सगुणाम्मा आशाम्मा (वय ३0) या महिलेची ही करुण कहाणी आहे. साडेबारा वर्षांपूर्वी आशाप्पाशी तिचा थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर त्यांना ११ वर्षांनी मुलगा झाला. त्याच्या पाठीवर मुलगी झाली. दरम्यानच्या काळात या ना त्या कारणावरून घरात कौटुंबिक कलह वाढले. त्याचा परिणाम होऊन सगुणाम्माचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर तिच्या नवर्‍याने तिला घराबाहेर काढले. संधी साधून तिने मुलीला सोडून मुलाला झोळीत घातले आणि गावागावांत भीक मागून पोटाची खळगी भरू लागली. मुलाला पाठीवर घेऊन दिवसभर वणवण फिरत दिवस कंठत असतानाच ती वाट चुकली. रेल्वेने हैदराबाद शहरात पोहचली. तेथूनही ती रेल्वेने पुण्यात आली. पुन्हा भटकंती करीत ती थेट चिखलीतील जाधवकडे गढीजवळ येऊन पोहचली. तेथे जवळ राहणार्‍या सुनीता व प्रकाश जाधव दांपत्यासह अनेक नागरिक तिला चिखलीत फिरताना पाहत होते. मात्र, तिची कोणीही चौकशी करीत नव्हते. दरम्यानच्या काळात एका रात्री तिचे बाळ काही अज्ञातांनी हिसकावून नेले. मोठमोठय़ाने ओरडूनही तिच्या मदतीला कोणी धावले नाही. त्यामुळे तिची मानसिक स्थिती अधिकच खालावली. तिने अन्नपाणी सोडले. अशक्तपणामुळे तिला चालता येणेही कठीण होऊन बसले. तशा परिस्थितीत ती जाधव दांपत्याच्या घरासमोर येऊन पडली.

No comments:

Post a Comment