Thursday 7 December 2017

उद्योग नगरी गारठली!

  • ढगाळ वातावरण : “ओखी’ चा प्रभाव
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यभर ओखी वादळाचा परिणाम जाणवत आहे. उद्योग नगरी देखील यातून सुटली नाही. सकाळपासून वातावरण ढगाळ राहून गारवा जाणवत होता. त्यातच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी झाल्याने वातावरणातील गारठा वाढल्याने पिंपरी-चिंचवडकर चांगलेच गारठले. दुपारनंतर सूर्यदर्शनामुळे वातावरणात बदल झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अरबी समुद्रात ओखी वादळाचा तीन दिवस धोका आहे. सोमवार दि. 4 पासून उद्योग नगरी व परिसरात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. सोमवारी सायंकाळी उद्योग नगरीत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शहराच्या काही भागांत सायंकाळी, तर काही भागांत रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. मंगळवारी सकाळी देखील वातावरणात फारसा फरक पडला नाही. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील गारठा वाढत गेला. सकाळपासूनच नागरीक स्वेटर्स, जर्कीन व कानटोपी अशी उबदार कपडे घालून दैनंदिन कामाला लागले. मात्र, दुपारी लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने वातावरणातील गारठा कमी झाला. शहरातील वाहतुकीचा वेग दुपारपर्यंत मंदावला होता. दुपारनंतर जनजीवन पूर्वपदावर आले.

No comments:

Post a Comment